जिंदगी भाकरीच्या दबावात आहे : कष्टकऱ्यांचं जगणं अधोरेखित करणारा गझलसंग्रह : अरुण विघ्ने

 



'हासणे हे जरी या स्वभावात आहे
जिंदगी भाकरीच्या दबावात आहे

कोणत्या पापणी मी तुला साठवावे
स्वप्न सारेच माझे लिलावात आहे! '

       हा मतला आणि शेर यवतमाळचे गझलकार, निवेदक किरणकुमार मडावी यांच्या नुकत्याच  प्रकाशित झालेल्या 'जिंदगी भाकरीच्या दबावात आहे' या पहिल्याच गझलसंग्रहातील आहे. जिंदगी भाकरीच्या दबावात असली तरी गझलकार मात्र व्यवस्थेच्या दबावाखाली येताना दिसत नाही . गझलकार हे स्वत: शेतकरी असल्याने त्यांनी या देशातील कष्टकऱ्यांची व पोशिंद्यांची व्यथा, वेदना जवळून अनुभवली आहे. ते स्वत: हे जीवन जगताहेत, भोगताहेत, अनुभवताहेत. त्यामुळे त्यांच्या गझलेत कष्टकऱ्यांच्या वेदनेचा जागर झालेला दिसतो. किरणकुमारची गझल म्हणजे त्यांचं मनोगत आहे. ती वंचित समाजाच्या, शेतकऱ्यांच्या व्यथा, वेदनेचे प्रतिनिधित्व करते. न्याय मागण्याचा प्रयत्न करते. यापूर्वी गझल लेखनात विषयाचा तोचतोपणा असायचा, सारख्याच धाटनीच्या गझला वाचायला मिळायच्या पण अलीकडे नवपिढीने वेगळा जोश यात भरलेला दिसतो. वैदर्भीयकरांची गझल ही अलीकडे कात टाकताना दिसते. तिने आपल्या कक्षा रुंदावल्या आहेत. अनेक विषय कवेत घेऊन यशस्वीतेच्या दिशेने वाटचाल करताना दिसते. गझलेचा वृक्ष बहरतो आहे. कुणी फांद्या छाटण्याचा प्रयत्न केला तरी तो दमाने बहरत राहील.यात गझलकारास शंका वाटत नाही.

'मी पुन्हा बहरेन येथे पूर्ण माझ्या ताकदीने
छाटल्या फांद्या जरीही छाटले हे खोड नाही! '

हाच शेर शेतकऱ्याच्या कष्टालाही लागू पडतो. शेतकऱ्यावर अनेक आसमानी, सुलतानी संकटे येत असतात पण तरीही तो न थांबता ताकदीने चालत राहतो. कारण थांबणे हे त्याच्या रक्तात आणि स्वभावात बसत नाही. कुटुंबप्रमुख हरला तर इतरांना जगविण्याचे आश्वासन तो कसे देणार ?
सरकारी योजना शेतकऱ्याच्या धुऱ्यापर्यंत जशाच्या-तशा पोहचतीलच याची खात्री वाटत नसल्याने गझलकारातील शेतकरी  व्यथित होताना दिसतो.

'एल्गार आतड्यांनी केला जरी किती
अडतात फायलींच्या दातात योजना‌! '

भुकेने कितीही एल्गार केला तरी ,जे व्यवस्था करते तेच येथे होतांना दिसते, याची जाणीव गझलकाराला आहे. जिंदगी भाकरीच्या दबावात असली तरी तो न जुमानता आपला प्रवास अव्याहत सुरूच ठेवतो. व्यवस्थेच्या नाकर्तेपणाची झलक त्याच्या शब्दांतून दिसून येते.
वंचितांच्या जगण्यातील ठणक तो आपल्या शब्दांतून दमदारपणे मांडण्याचा प्रयत्न करतो . शेतकरी व्यवस्थेचा बळी ठरतो आहे . म्हणूनच
व्यवस्थेविषयीची चिड शब्दांतून व्यक्त करताना म्हणतो -

'भारता ही तुझी काय रे दुर्दशा?
माकडांना दिला कासरा वाटतो! '

यापेक्षा आणखी कोणत्या  शब्दांत साहित्यिकांनी व्यवस्थेविषयी व्यक्त व्हावे? तरीही परिस्थिती सुधारताना दिसत नाही. ही खंत गझलकाराच्या मनात आहे. किरणकुमार यांच्या गझलेतील प्रत्येक शेराचा विषय वेगवेगळा, स्वतंत्र आहे. शेराच्या दोन ओळीत जगण्यातलं वास्तव शब्दांत मांडण्याचं कसब त्यांच्याकडे आहे. त्यामुळे त्यांची गझल वाचकांच्या हृदयात घर करते. त्यांचा एक मतला एक शेर बघू.

'नाहीच भास माझा पक्का कयास आहे
मातीतही फुलांचा नक्की सुवास आहे!

तोडू नका कळीला बागेपरी फुलू द्या
हा हक्क जीवनाचा त्याही जिवास आहे! '

यातील मतला व शेर हा येथील मातीचं मोठेपण अधोरेखित करतो. शेवटी माणसाची नाळ मातीशी जोडलेली असते. एवढंच नाही तर तो मानवी स्वभावाविषयीही भाष्य करू पाहतो. पूर्वी लिंगभेदांतून स्त्रीभ्रूणहत्या मोठ्या प्रमाणावर व्हायच्या. आता प्रमाण कमी झाले असले तरी व्यभिचार, अत्याचार, बलात्काराच्या घटना दैनिक वृत्तपत्रांच्या हेडलाईन होताना दिसतात. त्यामुळे मुलींनी आणि स्त्रियांनी स्वत: कणखर होण्याची गरज पुढील शेरातून तेवढ्याच ताकदीने कवी मांडतो आहे.

'समजू नको स्वत:ला कमजोर, शूद्र, अबला
तू सर्व या धरेचा रेखांश अक्ष पोरी!

उद्धार या जगाचा आहे तुझ्याच हाती
राहा सदैव येथे कर्तव्यदक्ष पोरी ! '

गझलकार किरणकुमार सजग, कणखर, दूरदृष्टी असलेला बापही आहे. लेकीला सजगतेचा कानमंत्र वरील शेरात देतो आहे.
किरणकुमार यांच्या गझला  गझलनवाज भीमराव पांचाळे, गायक रुद्रकुमार रामटेके यांनी गायलेल्या आहेत. गझल आपल्या कर्तृत्वाने मोठी होतेच पण सोबतच तिला स्वर आणि संगीत लाभले तर ती रसिकांच्या ओठांवर रुंजी घालत राहते. आणि गझलकाराचे शब्द रसिकांच्या हृदयावर राज्य करतात.
       किरणकुमारच्या गझलेचं साधं व रास्त मागणं आहे. काय मागते आहे ती निर्मिकाकडे? तर-

'दे मला अंधार सारा
तू जगाला तांबडे दे

जाहल्या नजरा विखारी
इज्जतीला कापडे दे ! '

हा दिलदार मनाचा गझलकार स्वत:साठी दुनियेचा अंधार मागतो आणि इतरांसाठी प्रकाशाची अपेक्षा करतो.भुकेसाठी मोजकेच आतडे आणि इज्जत झाकण्यासाठी कपडे मागतो. हा एका शेतकऱ्याच्या मनाचा मोठेपणा, परोपकारी भाव, त्याग व समर्पणाची भावना आहे. गझलकार उजेडाच्या कुळाशी नातं सांगतो आहे. त्याच्या गझलेचा सूर्यकिरण प्रश्नाच्या मुळापर्यंत जातो. किरणकुमारची गझल ही पोपटीच्या शेंगा नसून भूईमुंगाच्या दाणेदार शेंगेसारखी भरीव आहे. डोळ्यासाठी आसवाचे दान मागणाऱ्या किरणकुमारची गझल संस्कारही सांगून जाते. पाखरांसाठी, आदरणीय व्यक्तीसाठी, छोट्यांसाठी आणि  स्त्रियांसाठीही ती दान मागते आहे.

'माणसांचे कर भलेही सर्व अभयारण्य तू
पाखरांना पाखरांचे मोकळे तू रान दे

मान दे मोठ्यास आणिक प्रेम कर छोट्यांवरी
येथल्या नारीस सा-या मायचा सन्मान दे ! '

ही गझल वाचताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. राजा/राज्यकर्ता असावा तर असा. समाजाला आपल्या लेखणीतून चांगलं देण्याचा प्रयत्न गझलकाराने केलेला दिसतो. तो नव्या पिढीला नवी ऊर्जा देऊ इच्छितो. ही कुवत काळ्या आईकडून मिळाली असावी. मातीने त्याला हे संस्कार दिले आहेत. अनेक संत, समाजसुधारक, महापुरुषांनी समाजातील अनिष्ट गोष्टींवर आपल्या लेखणीने सडकून प्रहार केले आहेत. त्यांच्याच विचारांची कास धरून गझलकार ते विचार गझलेत रुजविताना दिसतो. तो फुले, शाहू, आंबेडकर विचारसरणीचा पुरस्कर्ता आहे.  आपल्या मनातील प्रश्नांची उत्तरे बाबासाहेबांना विचारताना तो म्हणतो,

'पुसतात रोज माझी जे जात आज बाबा
आहेच काय त्यांची औकात आज बाबा

धमन्यात धम्म आणिक, श्वासात संविधाना
भिनवून चालतो मी रक्तात आज बाबा

तू सूर्य शिक्षणाचा गात्रात पेरला अन्
आल्यात काळरात्री धाकात आज बाबा! '

रंजल्या गांजल्यांच्या जीवनात बाबासाहेबांच्या रुपाने प्रज्ञासूर्याचा उजेड आला. संविधानाद्वारे सर्वांना समान अधिकार प्राप्त झाले. बाबासाहेबांनी येथील लोकांना बुद्धाचा विज्ञानवादावर आधारीत धम्म दिला. ज्यामुळे सर्वांचे जीवन सुखकर, आनंदी आणि दु:खमुक्त व्हायला मदत होतेय. कायद्यामुळे गुलामीच्या बेड्या, साखळदंड गळून पडले. गझलकाराचा विद्रोही बाणा परिस्थितीशी, व्यवस्थेशी लढणारा आहे. हे बळ त्याला शिक्षणाच्या जाणिवेने व संविधानाने दिले असावे यात शंका नाही.  गझलकाराने आपल्या गझलेत समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय या  संवैधानिक मूल्यांचा अजिंठा कोरलेला दिसतो.
याच विषयाच्या अनुषंगाने समस्त मानवाच्या हक्काचे रक्षण संविधान करेल. असा पूर्ण विश्वास असल्याचे सांगणारा यवतमाळ येथील युवा गझलकार रमेश बुरबुरे यांचा सूचक मतला मला आठवतो. तो म्हणतो,

'जे हक्क पाहिजे ते सारेच दान करते
रक्षा तुझी नि माझी हे संविधान करते ! '
- रमेश बुरबुरे

किरणकुमार मडावी यांची गझल मानवाच्या अवतीभोवतीच्या सर्वच विषयाला हात घालते . यापैकी युवकांविषयी चिंता व्यक्त करताना तो म्हणतो -

'खेड्यात होतास चाबूक मित्रा,
शहरात झालास नाजूक मित्रा

भेटून बापास, ये तू जरासा
डोळे जहालेत, अंधूक मित्रा '

किरणकुमार मडावी यांच्या गझलेत वैदर्भीय बोलीच्या शब्दांचा अंतर्भाव झालेला दिसतो. हा गझलकार विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील, केळापूर तालुक्यातील, मोहदा येथील रहिवासी आहे. तो आपल्या वैदर्भीय (वऱ्हाडी) मायबोलीचा हात हातात घेऊन  गझलेचा गड सर करायला निघालेला आहे. बोलीतील शब्दांचे खुबीने उपयोजन करून, उपमा, प्रतिमांनी त्याने गझलेचे सौंदर्य फुलविले आहे. जसे 'काळजीचे पीक', 'फुलावर आलेली व्यथा' , 'हसण्याचे दान', 'जिंदगीची झोळी', 'वयाचा बहर' , 'शेतात अश्रू उगवले'.
ही त्याच्या गझलेची विशेषता व जमेची बाजू म्हणावी लागेल. त्यामुळेच किरणकुमारची गझल ही रसिक, वाचकांच्या हृदयाचा ठाव घेते. ज्यांची वेदना, व्यथा आपण समाजासमोर मांडतो, ती त्याला समजली पाहिजे. त्याच्या काळजाला भिडली पाहिजे. याच हेतूने त्याने गझलेचे पीक प्रसविलेले दिसते. म्हणूनच किरणकुमारच्या रचना प्रभावी ठरताना दिसतात. लोकांना आवडतात.‌ त्याच्या रचनेशी समरस होताना दिसतात. त्याची गझल ही त्याची न राहता ती रसिक,वाचकांची होऊन जाते. त्याची गझल आशावाद पेरते. ती  इतरांनाही लढण्याची ऊर्जा प्रदान करते.

'षंढ झाले मर्द सारे, थंड झाले रक्त सारे
लेखणीवर आळ आला का कुणाला बोलवेना ? '

किंवा

'घासून सज्ज ठेवा, आपापले विळे
विश्वासघातक्यांची खोदायची बिळे

भडवेगिरीत गेली त्यांची हयात अन्
देशात पोसले मी खाऊनिया शिळे ! '

किरणकुमारची गझल वाचकांना अशी अस्वस्थ करते. विचार करायला भाग पाडते. लढाऊ बाणा जपते. शेतकऱ्याच्या, कष्टकऱ्याच्या मनातील चिड, आक्रोश, आर्तता, विद्रोह, काळजी, जिव्हाळा, प्रेम, खदखद व्यक्त करते. ती निडर होऊन वास्तवतेशी भिडते. ती धाडसाने समाजात काय वाईट, काय चांगलं, कुणाचं कोठे चुकतंय? , कष्टक-यांची ठणक, दुखणं या बाबी समाजासमोर मांडते. गावखेड्याच्या माणसाला शहरासारखं गुळगुळीत व्यक्त होता येत नाही, जगता येत नाही,वागता येत नाही,बोलता येत नाही. कारण रोज तो वादळाशी दोन हात करीत असतो. हे गावातील माणसाचं वास्तव गझलकाराने जसंच्या तसं आपल्या गझलेत उतरवलं आहे.  तो माय, बाप, युवक, शेतकरी, कष्टकरी, मुलगी, स्त्री, पशू, पक्षी, निसर्ग यांचे मनोगत, हुंकार शब्दांतून व्यक्त करतो. म्हणून त्याची गझल व्यवस्थेशी थेट भिडताना दिसते . तो समष्टीला उद्देशून म्हणतो,

'गौतमाचा अन् भिमाचा घ्या जरा आदर्श अन्
थांबवा आता तरी या जात धर्माच्या चुका! '

किंवा

'कोण म्हणतो जात नाही जात व्यवस्थे
फक्त बुद्धाचा जरा धर हात व्यवस्थे ! '

जगाला युद्ध नको बुद्ध हवा. प्रत्येकालाच आयुष्यात सुख, समृद्धी, शांततापूर्वक व दु:खमुक्त जगणं हवं. त्यासाठी जात, धर्म, पंथ झुगारून कलह दूर करावा लागेल. ही रास्त अपेक्षा येथे व्यक्त होताना दिसते.
         शेवटी शेतकरीपुत्र गझलकार किरणकुमार मडावी यांनी आपल्या स्वाभिमानी व बाणेदार स्वभावाप्रमाणे घरच्या खात्रीलायक बियाण्याला कुणाच्या प्रमाणपत्राची वाट न बघता गझल पेरून आडतास घेतले आणि वरून फसाटीने मायेचा हात फिरविला. शेवटी खात्रीलायक बियाणं शंभर टक्के उगवलं आणि पीक टरारून आलं. मनोगताच्या चार काकरात तो म्हणतो 'माझी प्रत्येक गझल हे माझं मनोगत आहे. मग वेगळे मनोगत कशाला हवे ? ' गझलेत त्याने समाजमनाची व्यथा पेरली आहे, पुस्तकही वाचकांच्या स्वाधीन केले आहे. लोक वाचून चिंतन करताहेत, समजून घेताहेत. पण ज्याप्रमाणे मुलगी उपवर झाली की बापाला तिची काळजी वाटते त्याचप्रमाणे त्याने पेरलेली व्यथा फुलांवर आल्याने त्यालाही काळजी वाटणे स्वाभाविक आहे. कारण हे पुस्तक त्याचे पहिलेच अपत्य आहे. त्याच्या मनात थोडं कुतूहल व हुरहुर जरूर आहे.

'मी पेरली व्यथाही आली अता फुलांवर
लागेल काळजीचे हे पीकही निघाया ! '

किती बोलका शेर आहे हा? शेती हा एक जुगार आहे. तो निसर्गावर अवलंबून आहे. याची त्याला जाणीव आहे. पण पर्वा करू नये. निसर्गनियमानुसार  भूक आहे, तर भाकरही मिळेलच .याची इतरांनाही तो जाणीव करून देऊ इच्छितो.

'दिसतो तसाच साधा नाही प्रकार मित्रा
आहे खरा जिवाचा शेती जुगार मित्रा ! '

कामाच्या याही रगाड्यात तो त्याच्या कुटुंबावर, मुलाबाळांवर फार प्रेम करतो. गझलकार या देशातील समस्त मुलींना उद्देशून काय म्हणतो ? बघा -

'तू दान हसण्याचे पदरात टाक ना
लावीन जिंदगीला झोळी करायला!

पूर्वीपरी इथे ना बाजार राहिला
तू लागलीस पोरी मोळी करायला! '

किती गर्भित भावार्थ दडलेला आहे या ओळीत. दुनियेच्या चालीरीतीचे आपले अनुभव नव्या पिढीला तो देऊ इच्छितो. बाप आपल्या मुलीला शिक्षणाबरोबरच या दुनियेत जगण्याची रीतही शिकवितो. माय-बापाच्या मेहनतीलाही तो विसरत नाही. त्यांच्यामुळेच हे शेतातील पीक दिसते. हेही कबूल करायला विसरत नाही.

'गाडून बाप येथे,गाडून माय आहे
तेव्हाच इज्जतीने फुलतेय शेतमाती! '

किंवा

'चतकोर भाकरीच्या तुकड्यात माय शोधू
ठिगळात जोडलेल्या लुगड्यात माय शोधू

जळत्या चुलीत जेथे विरतात आसवेही
नयनात कोंडलेल्या धुरड्यात माय शोधू ! '

शेतकऱ्याच्या मुलांचं जगणं फुलविणारे मायबाप महान आहेत. दिवसरात्र कष्टाची होळी केल्याशिवाय, घाम व रक्त आटविल्याशिवाय पेपरमेटची गोळीही मिळत नाही. हे कष्टकऱ्यांच्या जीवनातलं वास्तव गझलकार किती सहजपणे मांडून जातो? टुकार कारणासाठी राजकारण्यांचे मोर्चे , आंदोलने तेवढे प्रभावी ठरतात. पण शेतकऱ्यासाठी कुणी उभे राहत नाही.अनेक आंदोलने, मोर्चे दडपले जातात, चिरडले जातात. हे वास्तव लोक विसरणार नाहीत. असा  उपरोधिक टोलाही गझलकार लगावल्याविना
राहत नाही.

'रस्त्यास टाळुनी हा मोर्चा कुठे निघाला?
सत्त्यास टाळुनी हा मोर्चा कुठे निघाला ? '

या व्यवस्थेत केवळ दिखाऊपणाच ठासून भरलेला आहे काय? रास्त विषयावर का कुणी बोलत नाही, सत्याच्या बाजूने का कुणी उभे राहत नाहीत. असा प्रश्न कुणालाही पडल्याशिवाय राहणार नाही .  लेक जशी हासत हासत माहेरी येते तशीच गरिबीही येते. गरिबीने कष्टकऱ्यांच्या घरी पाहुण्या मुलीसारखं जरूर यावं पण तिने कायम मुक्काम ठोकू नये. असं गझलकारालाच काय? कुणालाही वाटल्याशिवाय राहणार नाही. अशावेळी स्वत:च सजग राहिलं पाहिजे, स्वाभिमानाने जगलं पाहिजे असेही सुचवू इच्छितो.

'आमंत्रणे जराशी घे रे तपासुनी ही
पत्रावळीत उष्ट्या ते मांडतात पंगत

जमतील माणसेही तुझिया सभोवताली
जगण्यासवे नको बस लिहिणे कधी विसंगत! '

हे गावखेड्यातील माणसाचं भोगलेपण गझलकार
मांडायला विसरत नाही. तद्वतच सजगतेचा व स्वाभिमानाने जगण्याचा इशाराही देतो.जगण्यात आणि लिहिण्यात विसंगती असू नये. वागण्या-बोलण्यात गफल्लत होऊ देऊ नये, असेही परखड मत गझलकार मांडतांना दिसतो.
        गझलकार किरणकुमार मडावी यांचे गझलेत विषय, आशय, कल्पकता, शब्दयोजन, वास्तवता, सत्य, परिस्थिती ही ठासून भरलेली असल्याचे दिसते. केवळ शब्दांची जुळवाजुळव नाही. तर  ती वाचक,  रसिकांना समाजाची व्यथा  प्रातिनिधिक स्वरूपाने कथन करते आहे. तिला असंख्य प्रश्न पडलेले आहेत. ती त्या प्रश्नांच्या उत्तराच्या शोधात आहे. आपण तिचं ऐकलं पाहिजे. तिच्या प्रयत्नांना हातभार लावला पाहिजे. तिची व्यथा, वेदना, तिची भूमिका समजून घेतली पाहिजे. तरच साहित्याला न्याय दिल्यासारखा होईल.
      पुस्तकाच्या मुखपृष्ठावर स्वत: गझलकाराचा आपल्या बैलासह, आऊतासह फोटो आहे. हे चित्र गझलेतील वास्तव मांडण्याचा प्रयत्न करते. या पुस्तकाची पाठराखण  गझलनवाझ भीमराव पांचाळे यांनी मोजक्या पण समर्पक शब्दांत केली आहे. ते म्हणतात -

'तू सूर्य शिक्षणाचा गात्रात पेरला अन्
आल्यात काळरात्री धाकात आज बाबा !

किरणकुमारचा हा शेर ऐकला आणि शहारून गेलो. काय ती पेशकश, काय तो जोश, काय ती आशयघन शब्दकळा...! त्याचबरोबर आत्यंतिक कळकळीच्या त्याच्या सामाजिक जाणिवांनी डोळ्यांच्या कडा कधी ओलावतात तेही कळत नाही '
हे पुस्तक अष्टगंध प्रकाशन,ठाणे यांनी प्रकाशित केले आहे. मुखपृष्ठ डिझाईन व शीर्षक सुलेखन आकाश सरकाटे यांनी केले आहे. या संग्रहात एकूण ९८ गझला आहेत. हे पुस्तक गझलकाराने 'पेनाच्या टोकातून निरंतर झिरपणाऱ्या निळ्या शाईस ' समर्पित केले आहे. तो पुस्तकाविषयी म्हणतो 'मी या संग्रहाचा तारू साहित्य प्रवाहात विनाशिडेनेच सोडलेला आहे. झुंजून उरायचे आदिम सत्व त्याच्यात असेल, तर ते  किनाऱ्यावर लागेलच. ' असा आत्मविश्वास बाळगून आहे. या आशावादासाठी व सुंदर, दमदार पुस्तकासाठी त्यांचे मनस्वी अभिनंदन!
.................................
अरुण हरिभाऊ विघ्ने
रोहणा, आर्वी, जि.वर्धा
मो. ८३२९०८८६४५
.
◾गझलसंग्रह:जिंदगी भाकरीच्या दबावात आहे
◾गझलकार : किरणकुमार मडावी
◾प्रकाशन :अष्टगंध प्रकाशन,ठाणे
◾पृष्ठसंख्या : १०६
◾मूल्य : २००/-₹

No comments:

Post a Comment