तीन गझला : सौ. सुनंदा भावसार

 



१.


किती कोलाहलामध्ये सुरू संवाद चिमण्यांचा

मलाही आठवत गेला जुना मग वर्ग पोरांचा


जरी व्याकूळ होते मी अचानक शांतही झाले...

थवा हुसकावला जेव्हा नकोशा मी विचारांचा


जसे शिक्षण पुरे केले परीक्षाही दिल्या सार्‍या !

अता अंदाज आलेला न सरणार्‍या परीक्षांचा!


तुझ्या माझ्यात कुठलेही  जरी नाते नसे काही

मनाला मुक्त होताना इथे आधार शब्दांचा !


मनाने शांत होताना किती आधार मौनाचा

नको सत्कार अन् शाली नको आवाज टाळ्यांचा


नको ना साद तू देऊस  मार्गावर परतताना

मला अंदाज आलेला भविष्यातील हाकांचा


खयालांनो नका येऊ रदिफ अन् काफियांमध्ये

तसा उपयोग ना काही अता कविता नि गझलांचा


२.


पाऊस किती आठवणींचा पडत राहिला शांतपणाने

ती गेल्यावर सुन्या घराला छळत राहिला शांतपणाने


आभाळाचे पडले पाणी,  किती बिया मग तशाच रुजल्या

बागेमधला कणकण हळवा रडत राहिला शांतपणाने


ती असताना कायम बडबड ,गडबड घाई... किती निरंतर

समोर त्याला जुना मूकपट दिसत राहिला शांतपणाने !


घरभर तोही हरवत नाही चष्मा आता तिथेच असतो

'कुठे हरवली?' एक वेंधळी...बघत राहिला शांतपणाने


निसर्गातला नियम जुना हा मावळतीची उन्हे उतरली

गुलाल उधळत सूर्य केशरी बुडत राहिला शांतपणाने


तिच्या गझलचा शब्द शब्द मग स्मरत राहिला शांतपणाने

नश्वरतेचा खयाल नंतर डसत राहिला शांतपणाने


जंगलातले काजळकाळे अंधाराचे राज्य पसरले

आणि चंद्रमा गूढ शांतता झरत राहिला शांतपणाने


३.


निश्चयाच्या अंकुशाने ठेवला काबूत आहे

जीवनाचा मत्त हत्ती...मी कुशल माहूत आहे


का तुझाही हट्ट इतका की भविष्यालाच पाहू

वर्तमानाला पहाना जो उद्याचा भूत आहे


तू शहाण्यांच्याप्रमाणे आजही पण हे पहा की

जायचे ते दूर गेले जे अता शाबूत आहे


वादळे भूकंप दुष्काळामुळे हैराण आम्ही

बांधतो आम्ही घराचे स्वप्न जे वाळूत आहे !


काळ येतोही बिकट पण तो कुठे थांबून असतो

कवळलेले दुःख कायम का बरे बाहूत आहे?


लाख इच्छांचाच माझ्या मी खुशीने उंट केला

मी स्वतःबाहेर माझ्या  उंट तो तंबूत आहे


सौख्य आणिक दुःखसुद्धा तू सुनंदा घेत जाना

जीवनाचे सत्यदर्शन दोन ह्या बाजूत आहे


........................................

सौ.सुनंदा सुहास भावसार,

नंदुरबार

No comments:

Post a Comment